49) खरेदीदाराने स्वत:च जागरूक राहावे
Originally published on January 31, 1993
Written by Dr Dileep Javadekar
भीती, लोभ आणि आशा हे शेअर बाजारतले गुंतवणूकदारांचे शत्रू आपण पाहिले. हे शत्रू आपल्या मनातच असतात आणि योग्य वेळ पकडून ते डोके वर काढतात. याशिवाय बाजारात आणखी शत्रू कोण? अगदी शत्रू म्हणत आले नाही, तरी बाजारात कुणापासून जपून राहायला हवं?
शेअरबाजाराचा किंवा खरे तर कोणत्याही बाजाराचा एक नियम आहे. खरेदीदाराने स्वत:च जागरूक राहावे. बाजारात भाजी किंवा आंबे खरेदी करताना भाजीवाला किंवा फळविक्रेता कितीही खात्री देत असला, तरी ती भाजी किंवा फळे आपण स्वत: डोळ्यांनी पाहून निवडून घेतो. कुणाच्या सांगण्यावर किंवा खात्री देण्यावर विसंबून राहायला तयार नसतो, कारण असे करण्यात कधीतरी फसण्याची शक्यता आपण ओळखून असतो. घरी गेल्यानंतर उघडून न पाहिलेल्या पेटीतील आंबे नासके निघण्यापेक्षा बाजारातच पेटी उघडून पाहिलेली बरी हे आपल्याला ठाऊक असते. नंतर तक्रार घेऊन गेल्यावर एखादा उर्मट भाजीवाला ‘तुम्ही सुशिक्षित लोक नेताना का पाहून नेत नाही?’ असं आपल्याला विचारू शकतो हे आपल्याला ठाऊक असते.
शेअरबाजारात तर हे तत्त्व कायम लक्षात ठेवायला हवे. चांगले शेअर सुचविणारे आपले मित्र, आपले सल्लागार, ब्रोकर्स आपल्या पैशाची कोणतीही गॅरंटी घ्यायला तयार होणार नाहीत. नियतकालिकांमधून जेव्हा ‘अमुक शेअर घ्या, तमुक विका’ अशा सूचना छापून येतात तेव्हाही यात छापलेले लिखाण विश्वास ठेवण्यासारखे जरी असले तरी अचूक आहे, अशी कोणतीही खात्री संपादकीय मंडळ घेत नाही. यातील सल्ला केवळ एक दिशादर्शक सल्ला मानावा. तो मानून नंतर होणाऱ्या संभाव्य तोट्याची जबाबदारी नियतकालिके घेत नाही. ही सूचना कुठे ना कुठे तरी नक्की छापलेली असते. शेवटी पैसे आपले-गुंतवणूकदाराचे गुंतत असतात. तेव्हा त्याची पूर्ण जबाबदारीही आपल्यावरच येते.
शेअरबाजार हा अफवा किंवा कंड्यांचा एक मोठा मेळावा आहे. काही काही वेळा शेअर ब्रोकर शेअर विकतात, की अफवा विकतात अशी शंका येण्यापर्यंत हे अफवांचे पीक फोफावते. टिपस्टेन किंवा ‘टिप’ देणारी एक जमात बाजारात अस्तित्वात असते. शेअरच्या किंवा कंपनीच्या Fundamentals बद्दल यांना काही ठाऊक नसते किंवा कर्तव्य नसते. फक्त आपल्याला कळलेली ‘टिप’ मागचा पुढचा विचार न करता चार जणांना सांगून टाकायची एवढे एकच काम हे लोक करतात.
अफवा किती भयानक वेगाने पसरू शकते याचा आपल्याला अंदाज नसतो. एखादी अफवा बाजार सुरू होण्याआधी दोन तास पसरायला सुरुवात झाली आणि ती फक्त माणसांच्या तोंडावाटेच म्हणजे एक दुसऱ्याला सांगूनच पसरते; कुठे छापून, भित्तीपत्रके चिकटवून पसरत नाही, असे गृहित धरले, तर एका माणसापासून निघालेली ही अफवा दोन तासांत किती पसरेल? फार तर शंभर-दोनशे, अगदी डोक्यावरुन पाणी म्हणजे पाचशे माणसांना ती कळेल, असा आपण अंदाज करू. परंतु आपला अंदाज किती चुकतो ते पाहा.
सकाळी नऊ वाजता ती अफवा इतरांना सांगायला एक माणूस सुरुवात करतो, असे धरून चालू. आपल्या या गणितामध्ये प्रत्येक माणूस ती अफवा फक्त पाचच लोकांना सांगतो आणि यासाठी तो पंधरा मिनिटे घेतो, असे गृहित धरू. तेव्हा सव्वानऊ वाजता ती गोष्ट एक अधिक पाच अशी सहा जणांना समजली असेल. साडेनऊ वाजता ती गोष्ट नव्याने कळलेल्या पाच जणांनी ती प्रत्येकी पाच म्हणजे पंचवीस जणांना सांगितली असेल. म्हणजे तेव्हा ती सहा अधिक पंचवीस म्हणजेच एकतीस जणांना ठाऊक असेल. अर्ध्या तासात एकतीस जणांनाच ही अफवा ठाऊक असल्यास त्यात काही विशेष नाही परंतु पुढे ती कशी पसरते ते पाहा :
९ वाजता १ माणूस
९-१५ वाजता.... १+५ ६ माणसे
९-३० वाजता.... ६ + (५ x ५) ३१ माणसे
९-४५ वाजता.... ३१ + (२५ x ५) १५६ माणसे
१०-०० वाजता.... १५६ + (१२५ x ५) ७८१ माणसे
१०-१५ वाजता.... ७८१ + (६२५ x ५) ३९०६ माणसे
१०-३० वाजता.... ३९०६ + (३१२५ x ५) १९५३१ माणसे
१०-४५ वाजता.... १९५३१ + (१५६२५ x ५) ९७६५६ माणसे
११-०० वाजता.... ९७६५६ + (७८१२५ x ५) ४८८२८१ माणसे
एका माणसापासून सुरू झालेली अफवा फक्त दोन तासांत जवळजवळ पाच लाख लोकांमध्ये पसरते. यामध्ये प्रत्येक माणूस ही बातमी फक्त पाचच माणसांना सांगतो हेही लक्षात घ्यावे. जर त्याने ती दहा-पंधरा-विस लोकांना सांगितली तर ती काय प्रचंड वेगाने पसरेल याचा विचारच न केलेला बरा.
तेव्हा एखादी बातमी बरेच जण बोलतात म्हणून ती खरी असेलच असे गृहित धरण्यात काही अर्थ नाही. त्या बातमीच्या मुळाशी केवळ एका माणसाच्या सुपिक डोक्यातून निघालेला काही अर्थ दडलेला असण्याची शक्यता असते.